अहमदनगर – नगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेले 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने अखेर हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणातील पाणीसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला. त्यानंतर 2000 क्युसेकने खाली मुळा नदीत पाणी सोडण्यात येत आहे.
आता हे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. पाणलोटात पाऊस वाढल्याने विसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने तासागणिक मुळा नदीतील पाणी वाढ होते. काल गुरूवारी सायंकाळी मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग 10000 क्युसेक होता. रात्रीतून हे पाणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भंडारदरा धरण पाणीसाठा ( bhandardara dam water level )
या धरणाच्या पाणलोटातही पावसाचा जोर वाढल्याने आवक सुरू आहे. 10039 दलघफू क्षमतेचे हे धरण काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 10613 (96.14 टक्के) होता. काल दिवसभरात पावसाचा जोर कमी होता. पण सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला आहे.
धरणात पाण्याची आवक वाढल्याने आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची दाट शक्यता आहे. निळवंडेतही 90 टक्क्यांवर पाणीसाठा असून प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. तीनही धरणं भरल्याने नगरकरांच्या पिण्याचा, शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुळा धरण लवकर ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.