लम्पी रोगाने वाढले टेंशन
सर्वात प्रथम लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे. गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होणार नाही. तसेच मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस ही उपलब्ध आहे.
अहमदनगर : राज्यातील वाशिम, जळगाव, धुळे, अकोला पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यामध्येही जनावरांना (Lumpy Disease) लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याअनुशंगाने (Department of Animal Husbandry) पशुसंवर्धन विभागाकडून उपापययोजना राबवण्यास सुरवात झाली आहे. मात्र, ‘लम्पी’ हा संसर्गजन्य रोग असल्याने कमी कालावधीत अधिक जनावरांना त्याची लागण होते. यामुळे (Animal) जनावरे दगावली जात नाही पण रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून योग्य ती उपाययोजना ही गरजेची आहे. याबरोबरच गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या पालघरमध्ये रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. लम्पी त्वचा रोग जनावरातील विषाणूजन्य आजार आहे.
लम्पी रोगाची लक्षणे अन् परिणाम काय?
लम्पी हा एक त्वचा रोग असून त्याचा संसर्ग झपाट्याने होतो. जनावरांना लम्पी रोग होण्याचे कारणही तसेच आहे. जनावरांच्या गोठ्यातील गोचिड, माश्या, टिक्स यांच्या मार्फत या लम्पी आजाराची लागण होते. यामुळे जनावरास ताप येतो तर जनावराच्या डोके, मान, पाय, छाती, पाठ, कास येथील त्वचेवर ते 5 से.मी. व्यासाच्या गाठी येतात. पायावर सूज आल्याने जनावर लंगडते. एवढेच नाहीतर यामुळे जनावराची तहान-भूक कमी होऊन दुध उत्पादनावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे लसीकरण हा उत्तम पर्याय असून पशूसंवर्धन विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत सहभाग नोदवून लस देणे गरजेचे आहे.
काय आहे उपाययोजना?
सर्वात प्रथम लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा लागणार आहे. गोठ्यामध्ये कपारी नसायला पाहिजेत त्यामुळे गोमाशी आणि माशांचे प्रजोत्पादन होणार नाही. तसेच मंडळाच्या ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लम्पी या संसर्गज्यन आजारावरील लस ही उपलब्ध आहे. शेतरकऱ्यांना कोणत्याही कादगत्राशिवाय मोफत ही लस दिली जाते. गोठ्यामध्ये माशा, गोमाश्या, गोचिड हे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. शिवाय एखाद्या जनावरास हा आजार झाल्यास सुमारे 5 किमीपर्यंत लसीकरण मोहिम राबवली जाते. त्यासाठी पशूसंवर्धन विभागाला माहिती देणे गरजेचे आहे.
या जिल्ह्यांमध्ये वाढला संसर्ग
लम्पी रोगाचा धोका हा पावसाळ्यातच वाढतो. या दरम्यानच्या काळात जनावरांचे गोठे अस्वच्छ असतात. शिवाय सततच्या पावसामुळे ते स्वच्छ करणेही शक्य होत नाही. त्यामुळे सध्या या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. विशेषत: अहमदनगर, जळगाव, धुळे व अकोला या जिल्ह्यात पाळीव जनावरांना लम्पी स्कीन डिसीसचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. तर पालघर जिल्ह्यामध्येही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावराच्या गोठ्यात 20 टक्के इथर व क्लोरोफार्म, 1 टक्के फॉर्मलिन, 2 टक्के फिनॉल, आयोडिन जंतनाशके 1:3 प्रमाणात पाण्यामध्ये मिसळून फवारणी करण्यात यावी असल्या सूचना पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या आहेत.