Type Here to Get Search Results !

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू...

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र, भाजपचा प्लॅन बी



मुंबई: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्त्व पूर्णपणे संपुष्टात येईल, हा भाजपचा अंदाज सपशेल फेल ठरला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही देऊ केले होते. मात्र, संपूर्ण शिवसेना पक्ष ताब्यात आल्यानंतरही राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने म्हणावी, तशी वातावरणनिर्मिती होताना दिसत नाही. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र भाजपने आणखी एक महत्वाकांक्षी डाव टाकण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. 

महाराष्ट्र भाजप कडून केंद्रीय नेतृत्त्वाला एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकीसोबतच घेतल्या जाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास भाजपला मोठा फायदा होईल, आणि महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता येईल असा मतप्रवाह राज्यातील नेत्यांमध्ये आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी आता केंद्रीय नेतृत्त्वाकडे दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा आग्रह धरला आहे. केंद्रीय नेतृत्त्वाकडून सध्या या प्रस्तावावर विचारविनिमय सुरु असल्याचे समजते.

मात्र, महाराष्ट्र भाजपच्या प्रस्तावानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास अत्यंत रंगतदार परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेची पुढील निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. ती एप्रिल- मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसोबतच घेतली जावी, असा प्रयत्न महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सुरु आहे. तसे घडल्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटप करताना वाद निर्माण होईल. त्यानंतर मविआत पडलेल्या फुटीचा फायदा भाजपला उठवता येऊ शकतो, असा एक मतप्रवाह आहे.

शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात विविध घटकांसाठी नव्या घोषणा आणि आर्थिक तरतूद करण्यात आली होती. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वच घटकांना संतुष्ट केले होते. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे राज्यात लवकरच निवडणुका होऊ शकतात, असे संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव राहून भाजपचा चांगले यश मिळते, हा आजवरचा पॅटर्न आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकही एकत्र झाल्यास भाजपला पंतप्रधान मोदींच्या नावाचा फायदा करुन घेता येईल. असा मतप्रवाह भाजप नेत्यांमध्ये असल्याची माहिती केंद्रातील एका वरिष्ठ मंत्र्याने दिली आहे.

सौजन्य- महाराष्ट्र टाइम्स...

Tags