Ahmednagar News : महाराष्ट्रात खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले. सप्टेंबर व ऑक्टोबर च्या काळात जिल्ह्यातील दोन लाख 54 हजार 691 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. दरम्यान या बाधित शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यात आला.
जिल्हा प्रशासनाकडून यांचा सविस्तर अहवाल किंवा प्रस्ताव तयार झाला आणि शासनाकडे हा प्रस्ताव मदतीसाठी पाठवण्यात आला. शासनाने अहमदनगर जिल्ह्यासाठी 291 कोटी रुपयांची अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र, आता हा निधी शेतकऱ्यांना जुन्या कार्यपद्धतीने न देता नवीन कार्यपद्धतीने मिळणार आहे.
म्हणजेच आता हा निधी थेट शासनाकडून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. यासाठी महाआयटी कडून संगणक प्रणाली विकसित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रोत्साहन पर अनुदानासाठी ज्या पद्धतीने शासनाकडून थेट रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रोसेस सुरू आहे त्याच धर्तीवर आता अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना देखील मदत देण्याचे शासनाने ठरवले आहे.
शासनाच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अतिवृष्टी ग्रस्त बाधितांना वेळेत भरपाई मिळण्यास मदत होईल. मात्र या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.
वास्तविक पाहता, खरीप हंगामात संपूर्ण राज्यभर अतिवृष्टीने हाहाकार माजवला होता. अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि सप्टेंबर व ऑक्टोबर म्हणजेच खरीप हंगामातील पिके जोमात असतांना म्हणजे काढणीला आलेल्या 1 लाख 55 हजार हेक्टर 355 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्राचे प्रशासनाकडून सर्वेक्षण झाले आणि एक सविस्तर अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला.
शासनाकडून मंजूर झालेला निधी आता थेट शासनाकडूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. एकंदरीत आता बीडीएस प्रणाली शासणाच्या माध्यमातून कालबाह्य ठरवण्यात आली आहे. वास्तविक ही प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरु शकते असं जाणकार लोक सांगत आहेत मात्र सद्यस्थितीला यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत आहे.
दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांना 291 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. एकंदरीत अतिवृष्टी होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटला आणि नुकसान भरपाई मंजूर होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप वर्ग झालेली नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडालेली असून शेतकरी बांधव लवकरात लवकर सदर निधी मिळावा यासाठी मागणी करू लागले आहेत.