भविष्यात नोकरी नसेल तर शेती करा, अब्दुल सत्तार यांचा सल्ला
महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती (Agriculture) हा विषय शिकवला जाणार आहे. याबाबतची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
Agriculture Minister Abdul Sattar : आता पाचवीपासून शिकवला जाणार शेती विषय, कृषीमंत्री सत्तारांची माहिती, शिक्षकांनाही देणार प्रशिक्षण
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा एका धोरणात्मक निर्णयाची माहिती दिली आहे. महाराष्ट्रात लवकरच विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती (Agriculture) हा विषय शिकवला जाणार आहे. पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाणार आहे. भविष्यात नोकरी जरी नाही लागली तरी शेती विषयात विद्यार्थी निपुण असतील हा यामागचा हेतू असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. या निर्णयामुळं शेती सुधारेल पर्यायनं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील असेही सत्तार म्हणाले.
शिक्षकांना देखील शेतीच प्रशिक्षण देणार
युवकांचा शेतीकडे कल वाढेल यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना पाचवीपासून शेती हा विषय शिकवण्याचे नियोजन केलं आहे. शेतीचे धडे गिरवण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावामध्ये असलेल्या सरकारी जागा दिल्या जाणार आहेत. शिक्षकांना देखील काही दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
बहुतेक मुलं मुली ही शेतकऱ्यांची असतात. ही मुले ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर सगळ्यांनाचं नोकऱ्या लागत नाहीत. त्यामुळं त्यांचा वडिलोपार्जित शेतीचा धंदा समजावा यासाठी पाचवीपासून शेतीचा विषय शिकवला जाणार असल्याची माहिती सत्तारांनी दिली आहे.
शेतात फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या गोष्टी लहानपणापासूनच शिकवल्या तर याचे परिणाम भविष्यात चांगले दिसतील असे सत्तार म्हणाले. दरम्यान, शिक्षकांना जर यासंबंधी योग्य प्रशिक्षण दिले तर ते विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं शिकवतील असेही सत्तार यावेळी म्हणाले.
शिक्षणमंत्र्यांशी देखील याबाबत बोलणे केले जाणार आहे. शिक्षणमंत्री यामध्ये शेती विषयक एक तास कसा घेता येईल याबाबतचा निर्णय सांगतील असे सत्तार म्हणाले. याचा ढाचा आम्ही ठरवणार आहोत. पाचवी ते बारावीपर्यंत शेती विषयाचे शिक्षण दिले जाणार आहे. बेसिक विषय सोडून शेती विषय शिकवला जाणार आहे. याचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सत्तार म्हणाले.
अभ्यासक्रम तयार करण्यासाठी कृषी विभागाची दोन लोक तसेच शिक्षण विभागाची दोन लोक अशी चार लोकांची समिती तयार केली जाईल. ही समिती चारही बाजूनं अभ्यास करतील त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल असे अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.