महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार
गेल्या 40 दिवसांपासून रखडलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. आज एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde) नऊ तर भाजपकडून (BJP) नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.
उत्तर महाराष्ट्राला पाच मंत्रिपदं
उत्तर महाराष्ट्रातून तब्बल पाच आमदारांची मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राला झुकते माप दिले आहे. मालेगावचे दादा भुसे (Dada Bhuse), जळगावचे गिरीश महाजन (Girish Mahajan), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), नंदुरबाराचे विजयकुमार गावित यांच्यासह नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्री मंडळात स्थान दिले आहे.
औरंगाबादला (Aurangabad) तीन मंत्रीपदं
शिंदे सरकारमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला एकूण तीन मंत्रिपद मिळाले आहे. पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदिपान भुमरे, औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे आणि सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली आहे. अब्दुल सत्तार यांना शेवटच्या क्षणी संधी मिळाली. त्यामुळे औरंगाबादला तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. औरंगाबादमध्ये आधीच दोन केंद्रीय मंत्री आहेत, आता तीन कॅबिनेट मंत्र्यांची भर पडली आहे.
संजय शिरसाठ यांचा पत्ता कट
या सगळ्यामध्ये संजय शिरसाट यांचा पत्ता कट झाल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जातंय. शिरसाट यांना शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना मंत्रिपद मिळणारच असा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. मात्र या मंत्रिमंडळाच्या यादीत शिरसाट यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. पण आपण नाराज नसल्याचं संजय शिरसाठ यांनी स्पष्ट केलं आहे.
पश्चिम महाराष्ट्राला चार मंत्रीपदं
राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला तीन मंत्रीपदं देण्यात आली आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील, पाटणचे शंभूराज देसाई, मिरजचे सुरेश खाडे आणि सोलापूरच्या तानाजी सावंत यांचा समावेश आहे. यामध्ये चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरुडमधून निवडून आले आहेत, त्यांना मोठं मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच त्यांच्याकडे कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाची तर सुरेश खाडे यांना सांगलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.
कोकणला दोन मंत्रीपदं
कोकणातून उदय सामंत आणि दीपक केसरकर यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही मंत्री शिंदे गटाचे असून भाजपने कोकणातील एकाही नेत्याला संधी दिली नाही. दीपक केसरकर हे सुरुवातीपासून शिंदे गटासोबत असून ते शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत.
विदर्भातून दोघांना संधी
विदर्भातून स्वत: देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असून आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सुधीर मुनगंटीवार आणि संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. मुनगंटीवार यांना भाजपकडून तर राठोड यांना शिंदे गटाकडून संधी देण्यात आली आहे.